रवींद्र महाजनी हे नाव कानावर पडताच त्यांच्या अनेक वेगवेगळ्या गाजलेल्या भूमिका डोळ्यासमोर येतात. महाजनी यांच्या दशकातील माझा जन्म जरी नसला तरीही त्यांच्या त्या प्रत्येक भूमिका आजही मनात ठसलेल्या आहेत. त्यावेळी त्यांना मराठी चित्रपटातील ‘विनोद खन्ना’ म्हटलं जायचं. पण, आजच्या पिढीतील तरुणांना कोणी विचारले की, रवींद्र महाजनी कोण, तर लगेच त्यांचं ‘निसर्ग राजा ऐक सांगतो’ हे गाणं आठवतं आणि आपसूकच या गाण्यातील अभिनेता बोलून जातो. आणि, आताची त्यांची ओळख म्हणजे, गश्मीर महाजनी यांचे वडील. तसेच, त्यांच्या अनेक चित्रपटांमधील गाणी आजही सुपरहिट आहेत.

लहानपणी रवींद्र महाजनी यांचे खूप चित्रपट पाहिले आहेत. मी त्यांच्या जमानातला नसलो तरी त्यांच्या प्रत्येक अभिनयाची भुरळ आजही माझ्या मनावर आहे. काही वर्षांपूर्वी, म्हणजे जवळ जवळ दहा वर्षांपूर्वी एका मराठी गाण्यांच्या वाहिनीवर त्यांची एक छोटीशी मुलाखत दाखवली होती. त्यात त्यांनी त्यांच्या ‘लक्ष्मीची पाऊले’ या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं. हा चित्रपट 1982 साली कृष्णधवल रंगात प्रदर्शित झाला होता. आणि याआधी 30 वर्षांपूर्वीच रंगीत चित्रपटनिर्मितीला सुरुवात झाली होती. तरीही ‘लक्ष्मीची पाऊले’च्या निर्मात्याने कृष्ण धवल रंगातच चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले होते. कारण, त्यावेळी निर्मात्याकडे तेवढे पैसे नव्हते. तरीही त्या चित्रपटाची गोष्ट, गाणी आणि रवींद्र महाजनी यांच्या अभिनयावर पूर्णपणे विश्वास ठेवून हा चित्रपट प्रदर्शित केला होता. आणि तो चित्रपट पुढे हिट झाला होता. त्यातील ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ हे गाणं आजही ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. आणि, तेव्हापासून आजपर्यंत रवींद्र महाजनी हे नाव माझ्या मनात अजून खोलवर रूतलेलं आहे.

‘मुंबईचा फौजदार (1984)’ या चित्रपटामधील ‘हा सागरी किनारा’ हे गाणं आणि त्यामधील त्यांचा रोमँटिक अभिनय आजच्या पिढीतील तरूणाच्या अंगावर सुध्दा काटा आणतो. या गाण्याचं आणि अलिबागचं सुध्दा एक विशेष नातं आहे. ते म्हणजे या गाण्याचं चित्रीकरण हे अलिबाग तालुक्यातील सासवणे समुद्र किनारी झालं होतं. आणि, आजही जेव्हा समुद्र किनारी जातो तेव्हा हे गाणं आपसुकचं माझ्याकडून लागलं जातं. त्यामुळे माझ्यासाठी हे गाणं खुप जवळचं आहे. तसेच, ‘झुंज (1975)’ या चित्रपटातील ‘कोण होतीस तु, काय झालीस तु’ हे अर्थपुर्ण गाणंसुध्दा तेव्हा खुप गाजलं होतं आणि आजही गाजत आहे.

रवींद्र महाजनी यांचे गाजलेले चित्रपट ‘दुनिया करी सलाम, मुंबईचा फौजदार, झुंज, कळत नकळत, आराम हराम आहे, लक्ष्मीची पाऊले’ तसेच काही मराठी वाहिन्यांमधून अभिनयाची छाप उमटविली आहे. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील हिंदी भाषेतील तोही मराठी भूमिकेतील आपल्या मुलासोबत केलेला शेवटचा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झालेला ‘पानिपत’ हासुद्धा तितकाच गाजला. त्यांचं वय झालं होतं तरी अभिनयात तोच तरूणपणातला जोश कायम दिसत होता. आणि त्यांचा अभिमानही वाटत होता की, एक ज्येष्ठमराठी कलाकार हिंदी भाषेतील चित्रपट गाजवतोय.

पण, शनिवारी सकाळी दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूची बातमी समजली. खरंतर, त्यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाल्याचे समजते, पण या एवढ्या मोठ्या गाजलेल्या कलाकाराचा असा अंत होणे हे भारतीय चित्रपटसृष्टीचे दुर्दैवच. त्यांच्या अचानक जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती भरून निघणे केवळ अशक्यच…
Leave a comment