जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाचा असलेला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन. हा झाडांपासून विनामूल्य आपल्याला मिळत असतो. तसेच दैनंदिन जीवनातल्या खुपशा गोष्टी आपल्याला झाडांपासून मिळत असतात. झाडांमुळे जमिनीची धूप कमी होते, पाऊसही योग्य प्रमाणात पडतो. रखरखत्या उन्हात सावली देण्याचे कामही करतात. पण आजकाल सिमेंटच्या जंगलांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. आज पावसाचे घटते प्रमाण आणि वाढते तापमान याला फक्त झाडांची कत्तल हे एकमेव कारण कारणीभूत आहे.

रायगडातही मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड हा एक चिंतेचाच विषय बनत चालला आहे. झाडां अभावी मुंबईसारख्या प्रगत शहराची अवस्था आज खूप बिकट बनली आहे. उन्हाळ्यात होणार्या उन्हाच्या नाहक त्रासातून काही काळ मुक्तता मिळावी म्हणून रायगडच्या समुद्रकिनारी, झाडांच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. पण आज त्याच ठिकाणी वाढत्या पर्यटन व्यवसायांमुळे झाडांची कत्तल होऊन कॉटेज, बंगले, मोठे हॉटेल्स बांधले जात आहेत. झाडांची जंगले नष्ट होऊन सिमेंटच्या जंगलांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी आलेल्या चक्रीवादळामुळे येथील असंख्य झाडांचे नुकसान झाले आहे. समुद्रकिनारी असलेल्या जिवंत सुरूंची सुद्धा कत्तल होत आहे. पुढेही असेच चालू राहिले तर भयाण परिस्थिती निर्माण होऊ शकते. याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. इथेही मुंबईसारखी परिस्थिती उदभवल्यास पर्यटकही या ठिकाणी पाठ फिरवतील यात काही शंका नाही.

आज पैशांच्या मोहापायी मुळ मालक झाडांनी भरलेली जमीन (वाडी) दुसर्याला विकतो. आणि दुसरा मालक मोठाले बंगले, इमारती बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करतो. इतके वर्षे मुला प्रमाणे जपलेली झाडे डोळ्यांसमोर कत्तल होताना बघताना त्या मूळ मालकाला काहीच कस वाटत नसेल. काही वेळा तर मूळ मालकच असे कृत्य करतो. त्यात अजून भर म्हणजे उन्हाळ्यात लागणारे वणवे. त्या वणव्यांमुळे असंख्य झाडांचे नुकसान होत आहे. त्याचाच फायदा घेत काही जण मुद्दामून त्या ठिकाणी आग लावतात. मनुष्य आपल्या स्वार्थापोटी अशी कृत्य करत असतो. त्यामुळे आपल्यासोबत इतर प्राण्यांना सुद्धा याचा त्रास होत असतो. जंगलांना लावण्यात येणार्या वणव्यांमुळे जंगलात राहणार्या प्राण्यांचा सुद्धा या आगीत होरपळून मृत्यू होतो. काही ठिकाणी खुलेआम झाडे तोडल्यास त्यांना कार्यवाहीला सामोरे जावे लागत असल्यामुळे काहीतरी शक्कल लढवून झाडांच्या मुळात आग लावतात. त्यामुळे खालून झाड कमकुवत होऊन जमिनीवर पडते. झाड स्वतःहून पडल्यावर ते तोडण्यासाठी कसलीही परवानगी लागत नाही. अशाप्रकारे झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. यामुळे नैसर्गिक समतोल बिघडत चालला आहे. पावसाचे प्रमाण घटले आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोराना काळात जसा ऑक्सिजन विकत घ्यावा लागत होता तसाच पुढेही सर्वसामान्यांना विकत घ्यावा लागणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.

आज झाडे तोडण्याबाबत अटी व नियम असले तरीही आज त्याची अंलबजावणी होत नाही. संबंधित प्रशासनाचे सुद्धा याकडे लक्ष नाही. प्रशासनाने आज सर्व प्रकारच्या झाडांसाठी एक विशेष कायदा बनवला पाहिजे. विनाकारण आणि मर्यादेपेक्षा जास्त झाडांची कत्तल करणार्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. किंवा एक झाड तोडताय तर त्या एवजी दोन झाडे जास्त लावा हा नियम केला पाहिजे. कुठलेही झाड एका दिवसात कधीच मोठे होत नाही. त्यांना काही वर्षांचा कालावधी लागतो. कित्तेक वर्षे जुनी झाडे आज कत्तल करून नाहीतर वणवे लावून नष्ट केली जात आहेत. काहीजण नावापुरते किंवा देखावापुरते झाडे लावतात आणि सोडून देतात. अश्या वृक्षरोपणाचा काही फायदाच नाही. झाडेलावून त्यांची काळजी घेऊन ती वाढवली पाहिजेत. त्यासाठी सुद्धा संबंधित प्रशासनाने विशेष नियम केले पाहिजेत. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे फक्त बोलण्यापुरतं न राहता प्रत्यक्षात अवलंबन गरजेचं आहे. नाहीतर आजूबाजूला असलेल हिरवं रान पुढील काही वर्षात बोडके झाल्याशिवाय राहणार नाही.

Leave a comment